उस्मानाबाद/ प्रतिनिधी

गुजरात राज्यातील बडोद्याच्या मराठी वाङमय परिषदेच्या वतीने दिला जाणारा अभिरुची साहित्य गौरव पुरस्कार येथील कवयित्री भाग्यश्री रवींद्र केसकर यांना जाहीर करण्यात आला आहे. केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या कवितासंग्रहाला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे 60 वे वर्ष आहे.

 कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यावर दिवाळीच्या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण केले जाणार असल्याचे मराठी वाङमय परिषद, बडोदे यांनी कळविले आहे. येथील कवयित्री भाग्यश्री रवींद्र केसकर यांच्या काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे मराठी वाङमय परिषदेचे श्री धनंजय मुजुमदार यांनी कळविले आहे.

 बृहन्महाराष्ट्रातील एक महत्वाची साहित्य संस्था असा या परिषदेचा लौकिक आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी 90 वर्षांपूर्वी या परिषदेची स्थापना केली होती. मुंबई येथील ग्रंथाली या मान्यताप्राप्त प्रकाशन संस्थेच्या वतीने ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ हा कवितासंग्रह जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या काव्यसंग्रहला यापूर्वी दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. माहारज सयाजीराव गायकवाड यांच्या भूमीतून होत असलेला हा सन्मान आनंददायी आणि अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया भाग्यश्री केसकर यांनी व्यक्त केली आहे. 

 
Top