जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून कोरोना प्रतिबंधासाठी नवीन आदेशांची घोषणा

 


उस्मानाबाद / प्रतिनिधी:- 

कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात दि.12 मार्च 2021 पासून पुढील आदेशापर्यंत आज दि. 10 मार्च 2021 पासून रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी राहील. दर रविवारी जनता कर्फ्यू असेल. या दिवशी सर्व दुकाने, बाजारपेठा बंद असतील. सर्व धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं आणि मंदिरंही दर रविवारी बंद असतील असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आज जारी केले  आहेत.

          उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद करण्यात येत आहेत, संपूर्ण जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यूचे पालन करावे लागेल, या दिवशी सर्व दुकाने, बाजारपेठा बंद राहतील, तथापि रुग्णालयाशी संलग्न असलेले मेडिकल्स चालू ठेवता येतील. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, मंदिरे दर रविवारी बंद राहतील. धार्मिक विधीमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही. तसेच धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी “ नो मास्क नो एन्ट्री ” नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

           जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस्‍ कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक हे 50 टक्के क्षमतेने वैयक्तिक सरावासाठी चालू ठेवण्यास परवानगी राहील. या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील. स्पोर्टस्‍ कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक या ठिकाणी मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यास व प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही. जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस्‍ कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक येथे तपासणीमध्ये 50 टक्के क्षमतेचे व कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास ती जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस्‍ कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

15 मार्च पासून मंगल कार्यालयं बंद

 सर्व सामाजिक, राजकीय, निदर्शने, मोर्चा आदीनाही पुढील आदेशापर्यत मनाई राहील. भाजीमंडईमध्ये सामाजिक अंतराचे पालन होईल याअनुषंगाने संबंधित स्थानिक स्वराज्य

संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच दि. 15 मार्च 2021 पासून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल्स, लॉन्स बंद राहतील.

रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी

                जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पालिका, नगर पंचायतींच्या हद्दीमध्ये आज दि. 10 मार्च 2021 पासून पुढील आदेशापर्यंत रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत रात्रीची संचार बंदी राहील. या कालावधीत सर्व अत्यावश्यक बाबी (आरोग्य विषयक सुविधा, प्रवासी वाहतूक ) वगळून व्यक्तींच्या हालचालींना कडक प्रतिबंध राहील.

           या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच  भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.


 
Top