उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक ए. ए. खतीब यांच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. कोरोना कक्षामध्ये ड्युटी न करता गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये महानगर व अन्य शहरातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन कक्ष सुरू करण्यात आला होता. या कक्षामध्ये खतीब यांना 19 मे रोजी नियुक्त करण्यात आले होते. परंतु ते गैरहजर राहिले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेचे नेते श्यामसुंदर पाटील, पत्रकार नितीन खापरे पाटील, युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष किरण चव्हाण, विशाल शहा यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. तहसीलदारांनी तातडीने पथक पाठवून ऑन द स्पॉट पंचनामा केला. यामध्ये खतीब गैरहजर राहिले असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या प्रकरणी शिक्षण विभागाने व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते गालिब पठाण, पत्रकार नितीन खापरे पाटील यांच्या मार्गदर्शनात श्यामसुंदर पाटील यांनी चौकशी समितीसमोर पुरावे सादर केले. या पुराव्याच्या आधारे तसेच तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांनी खतीब यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. त्यांना परंडा येथे धारण अधिकार बहाल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कोरूना कक्षात काम न करता कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 
Top