उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान गर्दी  टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. हे लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख त्या आदेशांमध्ये नाही. 50 लोकांच्या मर्यादेत घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे 50 लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टंसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह येथे लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे प्राप्त होत आहेत.
वरील सूचना व मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरु झाला असल्यामुळे खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशित केले आहेत.  
 
Top