नागपूर (प्रतिनिधी)- कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांचा क्षमता विकास करून प्रक्रिया उद्योगासह इतर संलग्न क्षेत्राशी त्याची बृहद जोडणी करण्यात येईल. यासाठी आवश्यक धोरण तयार करण्यात येईल व आवश्यक निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये कॉन्फेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्यावतीने (सीआयआय) "भविष्याभिमुख महाराष्ट्रासाठी कृषी क्षेत्राचे कृषिउद्योगात रूपांतर : मूल्यवर्धन, नवोन्मेष व गुंतवणूक" विषयावर आयोजित फूड कॉनक्लेवचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, उद्योग विभागाचे सचिव  डॉ. पी. अन्बलगन, सीआयआयचे अध्यक्ष बुर्जीस गोदरेज आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतीमध्ये झालेले बदल हे या क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. यासंदर्भात  उचित उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कृषी क्षेत्रात मुल्यवर्धन करून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त फायदा होण्याच्या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासोबतच अन्न प्रक्रिया उद्योगाशी या क्षेत्राला जोडण्याचे कार्यही सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. कृषी संबंधित उर्वरित क्षेत्रामध्ये प्रक्रिया पद्धती रूजवून उचित परिसंस्था उभारण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू आहेत. 

 जागतिक बँकेच्या मदतीने राज्यात ‘स्मार्ट’ आणि ‘मॅग्नेट’ या महत्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. देशात सर्वात जास्त शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात या दोन्ही प्रकल्पांना केंद्र व राज्याच्या विविध योजनांद्वारे मदत करून कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी शासन कार्य करीत आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात मागील वर्षी पुणे येथे कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले व त्यात विविध स्टार्टअपस्द्वारे शेती क्षेत्रातील अडचणी दूर करण्याबाबत नवोन्मेशी प्रयोग पुढे आल्याचे त्यांनी सांगीतले.

कृषी क्षेत्रात क्षमता विकास आणि वित्त पुरवठा करण्यासाठी खाजगी क्षेत्राची मदत घेण्याबाबतही शासन विचार करीत आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांचा क्षमता विकास करून प्रक्रिया उद्योगासह इतर संलग्न क्षेत्राशी त्याची बृहद जोडणी करण्याच्या दिशेने कार्य सुरू असून आवश्यक धोरण तयार करण्यात येईल व यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नागपूर येथे आयोजित या परिषदेत जे विषय पुढे येतील त्याला राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासाठी राज्य शासन मदत करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी 'महाराष्ट्र द इकॉनॉमिक इंजिन पॉवरिंग विकसित भारत २०४७' विषयावर सादरीकरण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी विभागाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन झाले. सीआयआयचे अध्यक्ष बुर्जीस गोदरेज यांनी स्वागतपर भाषण केले तर संस्थेचे फिरोज खंबाटा यांनी आभार मानले.

 
Top