धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आणण्याची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचा दृढ विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यातील आठ नगरपालिका, आठ पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी पक्षाकडून संघटित व शिस्तबद्ध मोहीम सुरू असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रणनीती आखण्यात येत आहे. पक्ष संघटनेत उत्साहाचे वातावरण असून, प्रत्येक प्रभाग व बूथनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आढावा बैठका घेऊन स्थानिक मुद्द्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. विरोधकांच्या ताब्यात असलेल्या पालिकेत त्यांनी केलेल्या कारभाराच्या त्रुटींचा व लोकांना येणाऱ्या स्थानिक अडचणींचा बारकाईने अभ्यास करून, विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची आखणी केली जात आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत 55 जागा, आठ पंचायत समित्यांमध्ये 110 सदस्य आणि आठ नगरपालिकांमध्ये सुमारे 175 जागा असून, या सर्व ठिकाणी भाजपने स्वबळावर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी मित्रपक्षांसोबत युतीबाबत चर्चाही सुरू असल्याचेच सांगितले. तसेच केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा लाभ घेत जिल्ह्याच्या विकासाचा नवा आराखडा राबवण्याची तयारी पक्षाने पूर्ण केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात भाजपची पकड दिवसेंदिवस मजबूत होत असून, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जनतेचा वाढता विश्वास पाहता जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात येतील, असा आत्मविश्वास जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

 
Top