लातूर (प्रतिनिधी)- लातूर येथील रेल्वे कोच निर्मिती प्रकल्पात 2025 अखेरपर्यंत वंदे भारतच्या डब्यांच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे आधुनिकीकरण सुरू आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष (मित्र) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी या प्रकल्पाला भेट देऊन आढावा घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत ही माहिती समोर आली.

आमदार पाटील हे सोमवारी लातूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी बार्शी रोडवरील सारथी इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर रेल्वे कोचनिर्मिती प्रकल्पाला भेट दिली. मित्रच्या  उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्ह्याची आढावा बैठकही घेतली. याअंतर्गत स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोणते उपक्रम राबवता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली.

 

रेल्वे कोच प्रकल्पाला रस्त्यांनी जोडणार

रेल्वे निर्मिती कोच प्रकल्पात सध्या काय सुरू आहे, याचा आढावा आमदार पाटील यांनी घेतला. या प्रकल्पातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे किती जणांना रोजगार मिळेल, याबाबतही चर्चा झाली. प्रकल्पाच्या परिसरात सब व्हेंडर्स कसे उपलब्ध करता येतील, साहित्याची ने-आण करण्यासाठी प्रकल्पाची रोड कनेक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. उपजिल्हाधिकारी संगीता टकले, कायनेटचे व्यवस्थापकीय संचालक के. सत्यमूर्ती, एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक डी. व्ही. खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदी उपस्थित होते.


या सुविधांनी सज्ज असेल सारथी भवन

बार्शी रोडवर उभारणी सुरू असलेल्या सारथी भवनच्या बांधकामाची आमदार पाटील यांनी पाहणी केली. या भवनामुळे आगामी काळात मराठा समाजातील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. लातूर विभागीय केंद्राच्या धर्तीवर धाराशिव येथेही चार एकरांवर भव्य सारथी भवनाची उभारणी करण्यात येणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज प्रशासकीय इमारत, मुली आणि मुलांसाठी प्रशस्त वसतिगृहे, आधुनिक अभ्यासिका आणि भव्य ऑडिटोरीयमचा सारथी भवनात समावेश असेल. उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ, अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात आदी उपस्थित होते.लातूर येथील रेल्वे कोचनिर्मिती प्रकल्पात अधिकाऱ्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वागत केले.

 
Top