धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणी आमदार कैलास पाटील या अधिवेशनातही आक्रमक भूमिका घेत, तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्हा नोंद झालेले अनेकजण मोकाट आहेत. पोलिसांची यंत्रणेवर त्यानी प्रश्नचिन्ह उभे केले तसेच अजूनही याबाबत समाधान होईल अशी कारवाई केली नसल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणुन दिली.  ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात आरोपीवर मकोका लावण्यासाठी कायदा करणारे विधेयक मांडण्यात आले असून त्या चर्चेत सहभागी होऊन आमदार पाटील यांनी आपली भूमिका मांडली. 

आमदार कैलास पाटील म्हणाले, कमर्शियल सोबतच इंटरमिडीयेट (मध्यम) क्वांटिटी सापडल्यास व यापुर्वी ड्रग्ज तस्करीचे गुन्हे असतील तर त्यांच्यावरही मकोका लावावा अशी सूचना त्यांनी केली.कमर्शियल क्वांटिटी (50 ग्रॅम पेक्षा जास्त) ड्रग्ज सापडले तर मकोका लावणार असं विधेयकात म्हटले आहे, गुन्हेगाराना हे नियम माहित असून ते तस्करी करताना 50 ग्रॅम पेक्षा जास्त होणार नाही, याची काळजी घेऊन कायद्यातुन सूटतील. त्यामुळे अशी अट न ठेवता वारंवार जे लोक गुन्हे करतात त्यांना सुद्धा मकोका अंतर्गत समाविष्ट केले जावे अशी सूचना आमदार पाटील यांनी केली. 


मोबाईल चालू पण आरोपी पकडला जात नाही

तुळजापूर ड्रग्ज तस्करीत आरोपी असलेले मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संगीता गोळे व वैभव गोळे यांच्यावर यापुर्वी सुद्धा ड्रग्ज तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. तपासात तुळजापूर, सोलापूर, मुंबई अशी साखळी समोर आली आहे. 4 महिन्यापुर्वी आरोपीच्या जबाबात व दोषारोपपत्रामध्ये मुंबई येथील अतुल अग्रवाल याचे नाव समोर आले आहे. त्यांचे नाव व मोबाईल नंबर जबाबात आहे. त्यावर एकदा आपण फोन केला तर तो मोबाईल सुरु आहे. तो खुलेआम फिरत आहे. मग त्यांच्यापर्यंत पोलीस का पोहचले नाहीत? याचे उत्तर दिले पाहिजे असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला. 


दोन गुन्हे दाखल असल्यास मकोका लावा

परंडा येथील गुन्ह्यात ड्रग्ज म्हणुन कारवाई केली मात्र त्यांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीत पाठवताना ते होमगार्डमार्फत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल कॅल्शियम क्लोराईड असा आला. अहवाल कोन बदलला, ब समरी कोर्टात दिली. त्यानंतर पुन्हा चौकशी करायची भुमिका घेतली. कायदा कितीही चांगला केला तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा चांगली असेल तर कायदा बनवायला अर्थ आहे. गुन्हेगार यांचे नाव ड्रग्ज तस्करीत 2 पेक्षा अधिक वेळा आले की त्याला मकोका लावला पाहिजे तरच याला आळा बसेल. ग्रामीण भागात दारू, हातभट्टीचे प्रमाण जास्त आहे. आरोपीला अटक केली की लगेच सोडून दिले जाते, ते लोक वारंवार गुन्हे करतात म्हणुन दारू, हातभट्टी व गुटखा तस्करीचा यात समावेश करुन त्यांच्यावरही मकोका लावावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. 

 
Top