धाराशिव (प्रतिनिधी)- पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाला विष पाजून 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील बावी येथे आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने गाव हादरून गेले असून, गावात पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह पोलिस यंत्रणा दाखल झाली आहे.

दरम्यान,हा प्रकार ऑनलाइन रम्मीच्या खेळात पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून झाल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र, नेमका प्रकार कशाने घडला याबाबतचे कारण समोर आलेले नसून पोलिस तपास सुरू आहे. लक्ष्मण मारुती जाधव, असे आत्महत्या करून कुटुंबाला संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता.त्याने 3 वर्षांपूर्वी गावातील तेजस्विनी (21) यांच्याशी प्रेम विवाह केला होता.त्यांना दोन वर्षाचा मुलगा होता.

गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार लक्ष्मण जाधव याने कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विक्री केली होती. यानंतरही तो कर्जबाजारीपणातून मुक्त झाला नव्हता. त्यामुळे तो तणावात होता. दरम्यान, त्याने रविवारी रात्री पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन मारून त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी.

सकाळी घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह पोलिस अधिकारी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

 
Top