कळंब (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी सोमवारी एक आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. आमदार कैलास पाटील आणि जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार कळंब तालुक्यातील भाटशीरपुरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रेरणादायी संवाद साधला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर, बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला.

आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी भाटशिरपूरा शाळेला प्रत्यक्ष भेट देत नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांचे पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणात सातत्य ठेवण्याचे व उज्वल भविष्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले.

कलेक्टर पुजार यांनी विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती देत, शासन त्यांच्या पाठीशी कसे उभे आहे याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. आमदारांनी शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, असे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. संपूर्ण कार्यक्रमाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरली.

यावेळी देवधानोरा आणि भाटशिरपुरा गावातील बाळकृष्ण तांबारे, अच्युत गायकवाड ,भाटशिरपुरा उपसरपंच सूर्यकांत खापे,अतुल गायकवाड, सरपंच गायकवाड ताई, शिवाजी पाटील, राहुल पाटील, बापू नहाने,प्रतीक गायकवाड, नदीम मुलाणी,काळमाते, ऋषिकेश बोंदर,पालक, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top