उमरगा (प्रतिनिधी)- भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवादी स्थळांवर जोरदार हल्ला चढवून अतिरेक्यांचा खात्मा केला. पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्य दलाचा हा पराक्रम व सैन्य दलाच्या गौरवार्थ उमरगा येथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी भारत मातेच्या जयघोषाने संपूर्ण उमरगा नगरी दुमदुमली होती. या रॅलीत तालुकावासीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशाभिमानाची ज्योत पेटवली.
जम्मू काश्मिर येथील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी एक महिन्यापूर्वी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 अतिरेकी स्थळांवर जोरदार हल्ला करून अतिरेक्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत 100 पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला तर भारतीय सशस्त्र दलांच्या अचूक हल्ल्यात 11 पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केली. भारतीय सैन्य दलाचा हा पराक्रम व शौर्य गाथेच्या सन्मानार्थ भाजपा नेते शरण बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा येथे शनिवारी (दि.24) भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघालेल्या तिरंगा यात्रेत उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील, समाजसेवक विनायकराव पाटील, मुरलिधर मुगळीकर, डॉ. मल्लिनाथ मलंग, बसवराज कस्तुरे, ॲड. संजय बिराजदार, दिलीप भालेराव, मल्लीनाथ दंडगे, रफीक तांबोळी, माजी सैनिक राजू बेंडकाळे, व्यंकट चौधरी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रॅली दरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान जय किसान यासह विविध जयघोषांनी व देशक्तीपर गितांनी उमरगा नगरी दुमदुमली होती.