धाराशिव (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेले आठवडी बाजार, जिजामाता उद्यान यांच्या कामाला महायुतीच्या नेत्यांनी स्थगिती दिली. तर 140 कोटींच्या रस्त्याच्या कामाला भाजपा आमदाराने मुख्यमंत्र्यांना सांगून स्थगिती दिली होती. वाढीव निविदेमुळे याविरूध्द महाविकास आघाडीने वेळोवेळी आंदोलने केली. अंदाज पत्रकाप्रमाणेच काम व्हावे. ही आमची प्रमुख मागणी होती. परंतु महायुतीच्या नेत्यांनी वाढीव निविदेप्रमाणे काम होण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या आंदोलनामुळे त्यांचे प्रयत्न असफल झाले. त्यामुळे माजी नगराध्यक्षांच्या मालकाचे 22 कोटी रूपये बुडाले अशी घणाघाती टिका शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते सोमनाथ गुरव, काँग्रेसचे सिध्दार्थ बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेवून केली.
रविवार दि. 25 मे रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबा मुजावर, राणा बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी सिध्दार्थ बनसोडे यांनी 140 कोटी रूपयांच्या कामाचा राणा पाटील यांचा का संबंध आहे. त्यांनी या कामात हस्तक्षेप करू नये. शहराच्या रस्ते विकासासाठी न. प.सभागृहात आम्ही ठरावा घेतले. आम्ही निधी आणला. परंतु या कामास युतीची सत्ता येताच स्थगिती दिली. जेणेकरून हा निधी परत जावा. विरोधी नेत्यांनी संकोचित भावना विकास कामात ठेवू नये असे बनसोडे यांनी सांगितले. तर सोमनाथ गुरव यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही केलेल्या विकास कामामुळे व विरोधकांच्या भुमिकेमुळे शिवसेनेच्या आमदार, खासदार यांना धाराशिव शहरातून लोकांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले. 140 कोटी रस्त्याचे काम आमच्या आंदोलनामुळे मार्गी लागले आहे.
होय आमच्यामुळेच काम मार्गी
8 मार्च 2024 ते 28 मार्च 2024 रोजी निविदा प्रक्रिया झाली असताना निविदा उघडली जात नव्हती. त्यामुळे सोमनाथ गुरव यांनी 27 डिसेंबर 2024 रोजी 140 कोटीची निविदा का उघडत नाहीत या संदर्भात धाराशिव नगर परिषद सीओची नार्को टेस्ट करा अशी मागणी करून परत 6 जानेवारी 2025 रोजी रस्ता रोको केला. त्यावेळी न. प. सीओ ने रस्ता रोको मागे घ्या, 28 फेब्रुवारीपासून काम सुरू होईल. असे आश्वासन दिले. त्यानंतरही कामे सुरू न झाल्यामुळे 28 एप्रिलला आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर नगर विकास प्रशासनाने वाढीव निविदा वाटाघाटी करून अंदाजपत्रका प्रमाणे करावे असे सांगितले. त्यामुळे विरोधक आमच्यावर करीत असलेले आरोप चुकीचे आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री यांनी देखील या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे असे सांगितले.