धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद मुक्तिसंग्राम मधील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अधोरेखित करणारी साहित्यिक युवराज नळे यांची संशोधन पर साहित्यकृती 'मराठवाडा नव्हे, भारत मुक्तिसंग्राम' या ग्रंथास पुणे येथील मातंग साहित्य परिषद तर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी दिला जाणारा 2025 चा मानाचा “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाड्.मय पुरस्कार“ जाहीर करण्यात आला आहे. त्या संदर्भातील निवड झाल्याबद्दलची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ धनंजय भिसे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यसभा खासदार डॉ विनय सहस्रबुद्धे यांच्या शुभहस्ते आणि डॉ धनंजय भिसे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारतीय विचार साधना सभागृह, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी आयोजित समारंभात करण्यात येणार आहे. युवराज नळे लिखित 'मराठवाडा नव्हे, भारत मुक्तिसंग्राम' या ग्रंथास यापूर्वी दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असून हा जाहीर झालेला तिसरा पुरस्कार आहे जो राष्ट्रीय स्तरावरील आहे. सन्मानाचा हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल युवराज नळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.