धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव गोदामपाल यांनी भारतीय अन्न निगमच्या एमएसडब्ल्यूसी लातूर गोदामातून 13 फेब्रुवारी 2025 रोजी प्राधान्य योजनेचा तांदूळ धाराशिव गोदामासाठी वाहतूक केली.वाहन क्रमांक एमएच-40-एन-7513 मधून झालेल्या या वाहतुकीदरम्यान 8.94 क्विंटल (21 कट्टे) धान्य कमी असल्याचे आढळून आले. याबाबत मौजे तेर ता. धाराशिव येथे 25 ते 30 कट्टे धान्य विक्रीस आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. या प्रकरणात दोषींवर जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 अंतर्गत पोलीस ठाणे ढोकी येथे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला असून संबंधित वाहतूकदाराकडून अपहारीत धान्याची किंमत बाजारभावानुसार वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यापूर्वी अशा प्रकारची अफरातफर झालेली नाही. मात्र भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.तसेच वाहनाचा विमा,फिटनेस व पीयूसी नसल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाईसाठी सूचना देण्यात आल्या आहेत,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.