तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच हे गुरुवार राञी आपल्या चार चाकी गाडीने जात असताना यांच्यावर चार अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल वरून येऊन गाडीवर दगड अंडे मारुन आत पेट्रोल भरलेले पाकीट टाकुन अज्ञात मारेकरी फरार झाले.
यापुर्वी जवळगा मेसाई येथे पवनचक्की कंपनी व शेतकऱ्यांमध्ये वाद झाला होता. या बाबतीत प्रशासनाने अद्यापपर्यत कुठलीच पावले न उचलल्याने सरपंचावर हल्ला होण्याची घटना घडली. आता तरी यापुर्वी व गुरुवार झालेल्या घटनेची तक्रार दाखल घेऊन गुन्हैगार लोकांवर कारवाईची मागणी होत आहे. येथे कार्यरत असणाऱ्या पवनचक्की कंपनीचे मंडळी गाड्याचा ताफा व बाँऊन्सर घेऊन येत असल्याने येथे दशहत वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी चार जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच हे दिनांक 26 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनातुन व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडवर व्होनाळा गावाकडे जाताना वाटेत असताना दोन नेमप्लेट नसलेल्या मोटरसायकल वरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी मिळून सरपंचांच्या गाडीवर दोन्ही बाजूने अंडे,दगड मारून काच फोडून गाडीमध्ये सरपंच व त्यांचे मित्राच्या अंगावरती पेट्रोल भरलेले पाकीट फेकून हल्ला केला.
अशा प्रकारची फिर्याद नामदेव बालिश निकम वय 38 वर्ष राहणार मेसाई जवळगा यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 591/2024 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 110,324,(6)118(1),126(2)352,3,(5) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे करत आहे. तर घटनास्थळी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव तसेच इतर पोलीस तातडीने दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.