धाराशिव (प्रतिनिधी)-मणिपूर राज्यात स्त्रियांवर झालेल्या अमानवी कृत्याबद्दल धाराशिवकर स्तब्ध झाले. रविवारी सकाळी शहरातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकारांनी तासभर मौन सत्याग्रह केले. तसेच मानवतेला काळिमा फासणार्या देशविघातक कृत्याच्या निषेधार्थ संताप व्यक्त केला.
मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यांपासून हिंसाचार, दंगल, जाळपोळ, सैनिकांवर हल्ले आणि महिला अत्याचार सुरूच आहेत. महिलांवर झालेला सामूहिक अत्याचार किळसवाणा आणि संतापजनक आहे. या सगळ्या संतापजनक प्रकाराचा जाहीर निषेध करण्यासाठी धाराशिव शहरात मौन सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शहर आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने यात सहभागी झाले होते. धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सगुणा आचार्य, सोमनाथ गुरव,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय निंबाळकर, डॉ. प्रतापसिंह पाटील,माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, संजय दुधगावकर, धनंजय शिंगाडे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर,अय्याज शेख, खलिफा कुरेशी,कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. स्मिता शहापुरकर, प्रशांत पाटील, सय्यद खलील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, अनुराधा लोखंडे, रवि कोरे आळणीकर,नाना घाटगे, संकेत सूर्यवंशी, रवी वाघमारे, यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
शरमेने मान खाली गेली
मौन सत्यागृहानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी 78 दिवस या घटने विषयी काही झाले नव्हते. ज्यावेळेस अत्याचारग्रस्तांचा व्हिडीओ बाहेर आला त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. अत्यंत वेदनादायक म्हणजे देशाची सिमा रक्षण करणारे सैनिक त्यांच्या पत्नीवर अत्याचार झाला आहे. सैनिकांच्या परिवारातील माती बहिणींचे रक्षण आपण करू शकत नाही. आपले पंतप्रधान युक्रेन रशिया वाद मिटवण्याबाबत सहभागी होतात. परंतु मणिपूर जळत असताना गेल्या दोन महिन्यापासून प्रधानमंत्र्यांनी काही केले नाही. त्यामुळे भारत मातेचे आपण संरक्षण करू शकलो नाही म्हणून शरमेने मान खाली जाते असे मत आ.पाटील यांनी व्य्नत केले.

