उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयातील मुदत समाप्त झालेल्या उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा,मुरुम, कळंब,भूम व परंडा या नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता. तथापि, सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756/2021 बाबत दि. 12 जुलै 2022 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत समर्पित आयोगाकडून प्राप्त झालेला अहवाल महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी दि. 19 जुलै 2022 रोजी ठेवली आहे. त्यामुळे सध्या या निवडणुकीच्या प्रक्रिस राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम -2022 स्थगित केल्याने सुधारीत निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे कळविले आहे. त्याच बरोबार या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली आदर्श आचार संहिता आता लागू राहणार नाही, असेही जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग यांनी कळविले आहे.