उस्मानाबाद/प्रतिनीधी
महाराष्ट्र शासनाने,शासन निर्णय दि.27 डिसेंबर 2019 अन्वये राज्यातील शेतक-यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019  जाहीर केली असून दि.01 एप्रिल 2015 ते दि.31 मार्च 2019 या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पिक कर्ज घेतलेल्या तसेच अल्पमुदतीच्या पिककर्जाचे पुर्नगठन/फेरपुर्नगठन केलेल्या कर्जाचे दि.30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत व परतफेड न झालेल्या रक्कम रु2.00 लाखापर्यंतच्या रकमेस माफी देण्याबाबची अंमलबजावणी चालू आहे.
  या योजनेअंतर्गत दि 18 मे 2020 रोजीपर्यंत 68665 पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.त्यापैकी दि.26 मे 2020 पर्यंत 54284 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून त्यापैकी 52030 शेतकऱ्याचे कर्जखात्यावर रक्कम रुपये 384 कोटी 97 लाख रक्कम जमा करण्यात आलेली आहे.यादी प्रसिध्दी झालेल्यापैकी 16635 शेतकऱ्यांची रक्कम बँकेस लवकरच वर्ग करण्यात येणार आहे.
 महाराष्ट्र शासनाने दि.22 मे 2020 रोजी शासन निर्णयाद्वारे ज्या शेतकऱ्यांचे नांव कर्जमाफीच्या लाभार्थांच्या यादीत प्रसिध्द करण्यात आलेले आहे.परंतु त्यांच्या माफीची रक्कम बँकेस वर्ग करण्यात आलेली नाही अथवा ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा शेतकऱ्यांना खरीप 2020-21 हंगामाकरिता नविन पिक कर्ज उपलब्ध करुन देणेबाबत बँकास निर्देश दिले आहेत.
 तरी उस्मानाबाद जिल्हयातील योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी बांधवानी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून नव्याने पीक कर्ज घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top