धाराशिव (प्रतिनिधी) - पारगाव टोल नाका ते येरमाळा या दरम्यान रात्री चालत्या ट्रकमधील 29 बकरे व 1 शेळी लंपास करणाऱ्या चोरांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या वाहन चालकास हद्दीच्या वादावरुन हाकलून लावले आहे. हा प्रकार वाशी पोलीस ठाणे व कळंब पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी चालविला असून या हद्दीमुळे संबंधितांवर अन्याय होत आहे. या प्रकारामुळे हद्दीचा वाद अन् पोलीस देतात चोराला साथ असाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे संबंधितांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत त्यांची भेट घेऊन संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी दि.7 एप्रिल रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, बीड जिल्ह्यातील धारुर येथील शेळी बकरी - व्यापारी आसिफ आशाजी कुरेशी हे दि. 31 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भाड्याच्या (ट्रक क्रमांक आर जे 19 जी ई 1769) ने व्यापारी नियामत अली यांनी त्यांच्या नावावर जोधपूर (राजस्थान) येथून खरेदी केलेले 178 बकरे व शेळी (पाट) घेऊन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मार्गे चेन्नईकडे चालले होते. दि.2 एप्रिल रोजी मध्यरात्री अंदाजे 1 वाजण्याच्या सुमारास पारगाव टोल नाका ओलांडल्यानंतर काही अंतरावर पाठीमागून येणाऱ्या चार चाकी चालकाने ट्रकच्या ड्रायव्हरला ट्रकमधील बकरी कोणीतरी खाली रस्त्यावर फेकत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी सरमकुंडी फाटा येथे उजेडात येऊन बकरी मोजून पाहिले असता 139 बकरे व शेळ्या दिसून आल्या. तर 29 बकरे व 1 शेळी कोणीतरी चोरट्याने काढून चोरून नेल्याचे मी सांगितले. त्यानंतर कुरेशी यांनी उर्वरित माल बाजारात पोहोचविण्यास उशीर होईल व आणखी काही बकरी चोरी होतील म्हणून त्यांनी तो माल तसाच पुढे घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर सकाळी कुरेशी व काही व्यापारी यांनी पारगाव टोल नाका ते येडशीट टोल नाक्यापर्यंत जाऊन तेथील ढाबेवाल्याकडे व काहीजणांकडे विचारपूस केली. परंतू काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे कोणीतरी आज्ञा चोरट्याने पारगाव टोल नाका ते सरमकुंडी फाटा दरम्यान ट्रकवर पाठीमागून चढून ट्रकमधील 29 बकरी व 1 शेळी असे 1 लाख 45 हजार रुपयांचा माल चोरून नेला आहे. प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर त्यांनी उद्या या असे सांगितले. त्या दिवशी गेल्यानंतर या एफआयआर दाखल केला. परंतू तुम्ही रहिवाशी बीड जिल्ह्यातील धारूर येथील असल्यामुळे तो रद्द करून धारूर पोलीस स्टेशनमध्ये झिरो क्रमांकाने गुन्हा दाखल करावा, असे सांगून त्यांना हाकलून दिले. त्यानंतर कुरेशी यांनी येरमाळा व कळंब पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. परंतू हद्दीचे कारण देत दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यास संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांनी नकार दिला. त्यामुळे हद्दीच्या कारणामुळे पोलीस चोरट्यांनाच साथ देण्याचे काम करीत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांची अन् चोरट्याची कुसंगत !
असाच प्रकार दि.29 जून 2024 रोजी पारगाव टोलनाक्या जवळून चालत्या ट्रकवर चढून आतील शेळ्या व बकऱ्यांची अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. त्यावेळी देखील पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र कुरेशी यांनी चोरी गेलेल्या बकऱ्यांचा शोध घेत असताना सोमवार दि. 15 जुलै 2024 रोजी कळंब येथील बकऱ्याच्या बाजारात चोरी गेलेली राजस्थान येथील वेगळ्या प्रकारची बकरी त्यांना दिसून आली. कुरेशी यांनी त्यावेळी कळंब तालुक्यातील उपळाई येथील विनोद हरभरे व इतर 3 साथीदारांना त्यांना पोलिसांच्या मदतीने रंगेहात पकडले. त्यांनी बकऱ्यांची चोरी केल्याचे मान्य केले. पोलिसांनी देखील चोरी गेलेल्या बकऱ्यांची किंमत हरभरे व त्याच्या साथीदाराकडून घेऊन कुरेशी यांना देऊन ते प्रकरण मिटविले. मात्र त्यांना अटक केली नाही किंवा साधा गुन्हा देखील पोलिसांनी दाखल केला नाही हे विशेष. त्यामुळे या भागात 20 ते 25 जणांची चालत्या वाहनांमधील शेळी बकऱ्या व इतर माल चोरी करणारी टोळी कार्यरत आहे. मात्र, त्यांना जेरबंद करण्याऐवजी त्यांना अभय देण्याची काम पोलीस करीत असल्याचे दिसून येत आहे.