उमरगा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा आणि उमरगा तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने उमरगा येथील शांताई मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य नागरी सत्कार आणि समाज मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मंत्री बावनकुळे यांनी तेली समाजाच्या अडचणी समजून घेत मंत्रालयीन पातळीवर सोडवणुकीचे ठोस आश्वासन दिले.
ते म्हणाले की, “तेली समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती हीच आमची जबाबदारी आहे. समाजाला निधीची कमतरता भासू देणार नाही. शासकीय योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन दिले जाईल. काही महिन्यांत समाजाच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष बैठक घेऊन अडचणी सोडवण्यात येतील.“
कार्यक्रमात धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे यांनी समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. समाजातील युवकांना शैक्षणिक मदत, शासकीय योजनांचे मार्गदर्शन, आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी संत संताजी जगनाडे महाराज यांचे मंदिर उभारणीसाठी मदतीची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर उमरगा येथे सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी मंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या भव्य कार्यक्रमात माजी मंत्री बसवराज पाटील, संताजी चालुक्य, कैलास शिंदे, जिल्हा सचिव ॲड. विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे, लातूर जिल्हाध्यक्ष विश्वनाथ खडके, उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी, उपाध्यक्ष शिवानंद कलशेट्टी, कार्याध्यक्ष सिद्धेश्वर कलशेट्टी, तालुका मार्गदर्शक बाबुराव कलशेट्टी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.