उस्मानाबाद/ प्रतिनिधी

अधिकाऱ्यांनी देखील स्वत:चा निर्णय चुकला असेल तर त्याची उजळणी करण्याचे धाडस दाखवायला हवे. जेथे जाणीव असते तेथेच सत्य असते. त्यामुळे पत्रकाराच्या टिकात्मक बातम्या असल्या तरी त्या सकारात्मक घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केले.

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी (दि.६) दर्पण दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतरा चव्हाण सभागृहात वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव यांची उपस्थिती होती.  जिल्ह्याच्या विकासासह ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. गावातल्या समस्या गावात कशा सुटतील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. मंडळनिहाय लोहशाही दिनाचा उपक्रम राबविण्यात येईल. गाव तिथे पानवठा उपक्रम राबवून शेतकरी, दानशुर लोकांच्या मदतीने गावात बियाणे बॅंक सुरू करण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेते शोयब मोमीण, पांडुरंग कुंभार, येनेशाम शेख, किरण जेटीथोर, केदार भोसले, गजेंद्र निकम, सोनू शिंदे, सलीम मोमीण, सादीक पटेल, अपूर्व माने, भागवत शिंदे, अप्पा शिरसाठे, विनोद हंडीबाग, किरण जेटीथोर, सुरेशकुमार घाडगे, श्रीकांत पवार, मनोज तवले, विलास मुळीक, हरी खोटे यांचा मान्यवरांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक गोळ्या, थंडीपासून बचाव करण्यासाठी टोपी आदी वस्तूंचे कीट देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावक धनंजय रणदिवे यांनी केले तर सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे व आभार प्रदर्शन सरचिटणीस श्री. जाधव यांनी केले.

कार्यक्रमास पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रमोद कांबळे, तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, अंबादास पोफळे,  सुरेश घाडगे,गौतम चेडे, विलास मुळीक, अब्बास सय्यद, पत्रकार अविनाश गायकवाड, प्रभाकर लोंढे, मल्लिकार्जून सोनवणे,  उमाजी गायकवाड,  निजाम शेख, किशोर माळी, अजित माळी, विनोद बाकले, दत्ता शिंदे, संतोष शेटे, सुरेश कदम, शंकर भोरे, अमजद सय्यद, सल्लाउद्दीन शेख, संतोष खुने, राहुल कोरे, इस्माईल सय्यद, संतोष जोशी यांच्यासह पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

पत्रकारांनी जनतेचा आवाज बनावे

दर्पण दिनानिमित्त आज चिंतन, मंथन व सिंहावलोकन व्हावे, हिच अपेक्षा आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकार तर होतेच. पण ते एक समाजसुधारक होते. त्यांचे गणित, विज्ञान, तंत्रज्ञानासह संस्कृत भाषेवरही प्रभुत्व होते. आज मराठी पत्रकारितेचा झेंडा संपूर्ण भारतात डोलाने फडकत आहेत. कोरोना संकटकाळात वृत्तपक्ष क्षेत्रासमोरही विविध आव्हाने उभे टाकली असताना देखील आपण सजगपणे काम करीत आहात. पत्रकारांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देवून त्यांचा आवाज बनून कार्य करावे, असे मतही यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांनी व्यक्त केले.

आम्ही तर जनतेचे सेवक - डॉ. फड

जिल्ह्याच्या विकासात्मक कामासाठी पत्रकारांची भूमिकाही महत्वूपर्ण असते, असे मत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,  पत्रकारांच्या बातम्यामुळेच जतनेचे मत तयार होत असते. त्यामुळे  पत्रकारांनी विकासात्मक कामाकडे लक्ष देवून प्रशासनाच्या चुका निदर्शनास आणून द्याव्यात. त्यामुळे दक्ष होवून चांगले काम करण्याची संधी मिळते. ही यंत्रणा जागृत राहिली तर विकास करणे अवघड नाही. कोणतेही काम मोठे नसते तर प्रत्येक काम तितक्याच ताकतीचे असते. लोकसेवक म्हणून काम  करीत असताना रस्त्यावर भीक मागणारा भिकारी सुध्दा आमचा मालक आहे. कारण नागरिकांच्या टॅक्सच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशातूनच लोकसेवकांच्या पगारी होतात. त्यामुळे लोकसेवकाकडून सेवेची अपेक्षा करणे हा नागरिकांचा हक्क असल्याचे मत डॉ. फड यांनी व्यक्त केले.

 
Top